भगवत्पूज्यपाद आचार्य शंकरांनी यावर दोन भाष्ये रचली आहेत हीच गोष्ट या उपनिषदाचे विशेष महत्त्व सांगण्यास पुरेशी आहे. एकाच ग्रंथावर, एकाच आचार्याने, एकाच सिद्धान्ताचा पाठपुरावा करणारी दोन भाष्ये लिहिल्याचे जगाच्या पाठीवर दुसरे उदाहरण नसेल. टीकाकार आनन्दगिरींनी याबद्दल असे मत व्यक्त केले आहे की या उपनिषदाची पदशः व्याख्या करूनही आचार्य शंकरांचे समाधान झाले नाही कारण त्यात शारीरक शास्त्राला (ब्रह्मसूत्राला) मान्य असणाऱ्या विवेचनाद्वारे उपनिषदांच्या वाक्यांचा अर्थ प्रकट केला गेला नाही. तो तसा प्रकट करण्यासाठीच आचार्यांनी या ‘वाक्य-भाष्या’ची रचना केली आहे.
प्रस्तुत विवरणात आचार्यांच्या पद भाष्याचाच बहुतेक ठिकाणी आधार घेतला आहे. जिथे कुठे क्वचित वाक्यभाष्यातून उद्धरण घेतले आहे तिथे तसा उल्लेख केला आहे.
जरी सर्वच उपनिषदे अत्यंत उदात्त व आशयघन आहेत तरी केनोपनिषदात परमात्म्याचे निरतिशय सधन बोधस्वरूपत्व जितक्या तीक्ष्ण, हृदयस्पर्शी पद्धतीने मांडले गेले आहे तितके इतरत्र क्वचितच आढळेल. तसेच फारच कमी शब्दांत पण तरीही कमालीच्या उत्कटतेने आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी त्यागाची व शरणागतीची आवश्यकता यात प्रतिपादिली आहे.
उपनिषदाच्या अध्ययनास प्रारंभ करण्यापूर्वी,ज्या मनाद्वारे हे अध्ययन व्हायचे ते मन उपनिषदातील सिद्धांताला अभिमुख करणे आवश्यक असते. जसे पालथ्या घड्यात पाणी भरण्यापूर्वी तो सुलटा अर्थात पाण्याला अभिमुख करणे आवश्यक असते, तसेच हेही.म्हणूनच उपनिषदांचे अध्ययन सुरू करण्याआधी, त्यातील भावाला परिपोषक अशा शान्तिमन्त्राचे पठण करण्यात येते. केनोपनिषदाचा शांतिमंत्र आहे ॐ आप्यायन्तु ममाङ्गानि। वाक्प्राणश्चक्षुःश्रोत्रमथो बलमिन्द्रियाणि च सर्वाणि। सर्वं ब्रह्मोपनिषदम्। माहं ब्रह्म निराकुर्यां मा मा ब्रह्म निराकरोदनिराकरणमस्त्वनिराकरणं मेऽस्तु। तदात्मनि निरते य उपनिषत्सु धर्मास्ते मयि सन्तु ते मयि सन्तु। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः।
– माझी सर्व अंगे बलवान होवोत,वाणी, प्राण, डोळे, कान इ. सर्व इंद्रिये बलवान होवोत. सर्वकाही उपनिषदात वर्णिलेले ब्रह्मच आहे. या ब्रह्माला मी न नाकारो. तसेच ब्रह्मही मला न नाकारो. आम्ही एकमेकांना न नाकारो. आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी आवश्यक असणारे उपनिषदांत सागितलेले गुण आत्म्यात रत अशा माझ्या ठायी वसोत.