सर्वसामान्य समाजाची अशी धारणा असते की वेदान्त हा कठीण आणि रहस्यपूर्ण विषय आहे. तो साधारण मानवी बुद्धीला अनाकलनीय असा आहे आणि आपल्या दैनंदिन जीवनाशी त्याचा काही संबंध नाही. परंतु स्वामीजींनी आपल्या अधिकारी वाणीने ही धारणा भ्रमित असल्याचे सिद्ध केले आहे. वेदान्ताचे गूढ सिद्धान्त स्वामीजींनी सरळ आणि सोप्या भाषेत आपल्यापुढे मांडून, त्यांद्वारे आपण आपले जीवन कसे उन्नत करू शकतो हे विशद करून सांगितले आहे. भारतीय संस्कृतीवर वेदान्ताचा किती गहन प्रभाव आहे, आणि दैनंदिन भारतीय जीवनपद्धतीवर त्याचा प्रभाव कसा दृग्गोचर आहे इत्यादीचे स्वामीजींनी सुंदर विवेचन केले आहे. वेदान्त एकांगी नसून सार्वजनीन आणि शाश्वत कसा आहे हेही त्यांनी सांगितले आहे. मनुष्य — मग तो कोणत्याही जातीचा असो, धर्माचा असो, सम्प्रदाय वा देशाचा असो, कोणत्याही युगातील असो त्याला आदर्श जीवन जगण्यास वेदान्त साहाय्य करतो हे सांगितले आहे.