स्वामी अतुलानंद हे श्रीरामकृष्ण-संघातील पहिले पाश्चात्य संन्यासी होते. त्यांना स्वामी विवेकानंदांचा निकट सहवास लाभला होता. यामुळे त्यांनी स्वत:च्या अवलोकनाच्या व अनुभवाच्या आधारावर स्वामी विवेकानंदांच्या पाश्चात्त्य जगावर पडलेल्या प्रभावाचे जे वर्णन केले आहे ते विशेष महत्त्वाचे आहे. स्वामी विवेकानंदांच्या जीवनात भारतीय संस्कृती, धर्म, न्याय, सेवा आणि इतर उच्च जीवनमूल्ये साकार झालेली असल्यामुळे पाश्चात्त्यांच्या मनावर पडलेला त्यांच्या शब्दांचा प्रभाव खरोखरच अतुलनीय आहे. शिकागो येथील सर्वधर्मपरिषदेमधे त्यांनी ‘‘अमेरिकेतील बहिणींनो आणि भावांनो’’ हे जे प्रारंभीचे शब्द उच्चारले त्यात त्यांच्या विश्वात्मबोधाचा प्रत्यय पाश्चात्त्यांना येऊन गेला. या शब्दांनी पाश्चात्त्यांची मने जिंकली आणि त्यानंतर स्वामी विवेकानंदांनी हिंदुधर्माची व भारतीय संस्कृतीची जी उदात्त शिकवण पाश्चात्त्यांना दिली तिचा कायमचा ठसा पाश्चात्त्यांच्या मनावर उमटला. ‘तोडफोड करण्याची करण्याची माझी इच्छा नाही, उभारण्याची व बळकटी आणण्याची माझी इच्छा आहे. मी सहिष्णुतेचा प्रचार करतो, कारण सर्व धर्मांमधे सत्य विद्यमान आहे’ या शब्दांमधून त्यांचा उदार भाव व्यक्त झाला होता. ‘समन्वय-सहकार्य, विध्वंस-विनाश नव्हे’ हे त्यांच्या उपदेशांचे मुख्य सूत्र असल्यामुळे त्यांच्या दैवी वाणीने पाश्चात्त्य जग साहजिकच प्रभावित झाले.