युगाचार्य स्वामी विवेकानंदांनी एका व्याख्यानात सांगितले होते, “हे भारता, विसरू नकोस की तुझ्या स्त्रियांचा आदर्श सीता, सावित्री आणि दमयन्ती आहे.” पवित्रतास्वरूपिणी, मातृत्वाची मूर्ती माताजी श्रीसारदादेवींमधे या सर्व नित्यलीलामयी पतिप्राणा सहधर्मिणी महान् स्त्रियांचा पतिनिष्ठा हा आदर्श तर होताच, शिवाय सेवापरायण कन्या, स्नेहशील बहीण, शिष्यवत्सल गुरू आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे करुणामयी, मुक्तिदायिनी मातेचा दिव्य आदर्श दृष्टीस पडतो. ज्या ज्या वेळी परमेश्वर अवतार धारण करून या धरातली जीवांच्या उद्धारार्थ येतात, त्यावेळी त्यांची शक्तीसुद्धा त्या लीलाकार्याच्या परिपूर्ती व परिपुष्टीसाठी त्यांच्यासोबतच येत असते. अवतार-वरिष्ठ भगवान श्रीरामकृष्णदेवांबरोबर त्यांची शक्तीसुद्धा – त्यांच्या लीलासहधर्मिणी माताजी श्रीसारदादेवी यांच्या रूपात – जीवांच्या उद्धारार्थ अवतरित झाली होती.
श्रीमाताजींचे आपल्याला विविध रूपांमध्ये दर्शन घडते. कधी त्या अनेक पापी-तापी-शरणागत बद्ध आणि मुमुक्षू जनांना भगवंताच्या रसास्वादनात रुची उत्पन्न करून अभय आणि मुक्तीचे द्वार उघडणाऱ्या रूपात दिसतात, कधी अहैतुकी कृपेने करुणाविगलित होऊन जन्मोजन्मी संसारताप-दग्ध जीवांवर प्रेम-शांतिरूप अमृतवर्षाव करून त्यांचा उद्धार करणाऱ्या क्षमारूपी, महातपस्विनी गुरुरूपात दिसतात, तर कधी हे गुरुपदसुद्धा दिव्य मातृत्वाच्या सर्वोच्च महिम्याने विभूषित करून ही भक्तवत्सल माता स्वतःच्या दैनंदिन जीवनात अतिसामान्य स्त्रीप्रमाणे दिसते, – राजराजेश्वरी असून सुद्धा दीनवेशात दिसते. माताजींमध्ये स्वतःचा दैवी ईश्वरीय महिमा झाकून ठेवण्याची असाधारण शक्ती होती. त्यांची निरंहकारी, निरभिमानी तसेच स्वार्थरहित जीवनाची आध्यात्मिक पराकाष्ठा अगम्य आहे.
भगवान श्रीरामकृष्णदेवांच्या महासमाधीनंतर त्यांच्याशी अलौकिकरीत्या त्यांच्याच भावात लीन राहून या चिरसधवेने त्यांच्या युगलीलाकार्याच्या विस्तारात अत्यंत कठोर आणि अथक परिश्रम केले. ‘शिवभावे जीवसेवा’ आणि ‘आत्मनो मोक्षार्थं जगद्धिताय च’ असे आदर्श घेऊन चालणाऱ्या, मानवाच्या सर्वांगिण उन्नतीमधे सेवारत असलेल्या रामकृष्ण संघाच्या ‘संघजननी’रूपात त्यांचे लोकोत्तर कार्य जगाला वरदान आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पौर्वात्य आणि पाश्चात्त्य आबाल-वृद्ध, नर-नारी, नव्हे सकल प्राण्यांना सुद्धा एक अशी ‘माता’ प्राप्त झाली, ज्यांच्या ईश्वरीय मातृत्वाला शरण जाऊन, जात-पात, उच्च-नीच तसेच इतर सर्व प्रकारचे भेदभाव, आपापसातील कलह-द्वेष यांनी रहित होऊन सर्वचजण त्यांना निस्संकोच भावाने ‘आई’, ‘मा’ म्हणून हाक मारू शकतात आणि निर्भय होऊन संसाराच्या वणव्यातून मुक्त होऊ शकतात.
नवयुगात अवतरित झालेल्या या महाशक्तिरूपिणी माताजी श्रीसारदादेवींप्रमाणे दुसऱ्या कोणत्याही महान स्त्रीला तिच्या जीवनात इतक्या प्रकारचे व्याप, जबाबदाऱ्या, भूमिका स्वीकारून, शांतपणे पार पाडाव्या लागल्या असे दिसत नाही – जगातील इतिहासात असे अद्वितीय उदाहरण शोधूनही सापडत नाही. इतकेच नव्हे पूज्यपाद स्वामी विवेकानंदांनी तर त्यांना भविष्यातील स्त्रियांसाठी आदर्श म्हणून सांगताना म्हटले आहे, “... त्यांचे अवलंबन घेऊनच जगात पुन्हा गार्गी, मैत्रेयी तयार होतील.”