‘‘स्वामी विवेकानंदांची पत्रे’’ ह्या ग्रंथाशी वाचक परिचित आहेतच. ह्यात स्वामीजींची सर्व उपलब्ध पत्रे प्रकाशित करण्यात आली आहेत. प्रस्तुतच्या ‘‘अग्निमंत्र’’ ह्या पुस्तकात मात्र आम्ही उपरोक्त पत्रांतून काही निवडक पत्रेच समाविष्ट करीत आहोत. ह्या निवडक पत्रांची विशेषता अशी की, ही पत्रे स्वामीजींनी आपल्या भारतीय शिष्यांना, मित्रांना व मठातील आपल्या गुरुबंधूंना लिहिलेली आहेत. ह्या सर्वच पत्रांत आपल्याला स्वामी विवेकानंदांचे खरे खरे अंतरंग दर्शन घडते. स्वामी विवेकानंदांची ‘पत्रे’, हा जणू एक नवीन योगविषयक ग्रंथच आहे. यात सर्वच योगांचा समन्वय असून, त्यांचे आचरण करण्यासाठी अत्यंत स्फूर्तिदायी शब्दांनी स्वामीजींनी मानवात्म्याला आवाहन केले आहे. म्हणूनच याचे नाव ‘आग्नमंत्र’ असे ठेवण्यात आले आहे. स्वामी विवेकानंद कोण होते? त्यांचे आपल्यावर कशा प्रकारचे प्रेम आहे, त्यांचे आपल्या मातृभूमीवर असणारे प्रेम कोणत्या दर्जाचे आहे व ते आपल्या सर्वांकडून कशाची अपेक्षा करीत आहेत — आदी सर्व तपशिलांवर ह्या पत्रांतून फारच उद्बोधक प्रकाश पडतो. आमची अशी इच्छा आहे की प्रत्येक भारतीयाने ही पत्रे अवश्य अभ्यासावयास हवीत. तेव्हाच आणि फक्त तेव्हाच आपल्याला आपले खरे कल्याण कशात आहे हे कळेल. त्याच प्रमाणे खरा धर्म म्हणजे काय? खरे देशप्रेम म्हणजे काय? खरा सुहृदभाव म्हणजे काय? पावित्र्य कशाला म्हणतात? जीवनात त्याग कशा प्रकारे येत असतो इत्यादी विषयांवर आपल्या कल्पना स्पष्टतर होतील.