भगवान श्रीरामकृष्ण, माताजी श्रीसारदादेवी आणि स्वामी विवेकानंद यांचे उपदेश सार्वजनीन स्वरूपाचे असून त्यात मानवी जीवनाचे अंतिम ध्येय काय आणि ते ध्येय गाठून जीवन सफल व कृतार्थ करून घेण्यासाठी मानवाने काय केले पाहिजे याचे अत्यंत स्पष्ट असे मार्गदर्शन आढळते. त्यांच्या दिव्य जीवनाच्या व अमृतमय उपदेशांच्या परिशीलनाने हृदयाला अपार शांती लाभते. सर्वसामान्य वाचकांना हा लाभ घेता यावा म्हणून आम्ही त्यांच्या काही निवडक उपदेशांचे संकलन या पुस्तिकेच्या रूपात प्रकाशित करीत आहोत. शिवाय या पुस्तिकेची किंमतही अत्यंत अल्प ठेवण्यात आली असून सोबत भगवान श्रीरामकृष्ण, माताजी श्रीसारदादेवी आणि स्वामी विवेकानंद यांचे एकत्रित चित्रही देण्यात आले आहे.