भारताला स्वातंत्र्य प्राप्त करून देणार्या महायज्ञामधे कित्येक महान विभूतींनी आफले तन-मन-धन अर्पित केले होते. त्यांमधील एक महत्त्वपूर्ण असे व्यक्तिमत्त्व म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस हे होत. नेताजी सुभाषचंद्र बोस यांना अशाप्रकारे स्वातंत्र्यसंग्रामामधे आणि बहुजन हिताय, बहुजन सुखाय आपले सर्वस्व अर्पित करण्याची प्रेरणा जगद्गुरू स्वामी विवेकानंद यांच्याकडूनच मिळाली होती. तसे पाहिले तर त्यांची व स्वामी विवेकानंदांची प्रत्यक्ष भेट कधीच झाली नव्हती. तरीदेखील नेताजींनी स्वामीजींना मनोमन गुरू मानले होते आणि जणू ते स्वामीजींद्वारा ‘अग्निमंत्रा’मधे दीक्षित झाले होते. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे चरित्र आणि व्यक्तिमत्त्व आजदेखील भारतवर्षातील कोट्यवधी नवयुवकांच्या समोर एका दीपस्तंभासमान त्यांना प्रेरणा तथा मार्गदर्शन करीत आहे. या त्यांच्या प्रकाशदायी प्रेरक व्यक्तिमत्त्वामागे स्वामी विवेकानंदांच्या दिव्य विचारांचे एक अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान होते. परंतु याविषयी बर्याच जणांना माहिती नाही. त्यांच्या जीवनात स्वामीजींच्या विचारांचा प्रभाव इतका जबरदस्त होता की ते दररोज ध्यान करीत आणि कुठेही रामकृष्ण-संघाचे आश्रम असल्याचे समजल्यास ते तिथे जात व आश्रमाच्या कामांमध्ये साहाय्य करीत.