स्वामी विवेकानंदांचे भारतावर अत्यंत प्रेम होते; त्याचबरोबर या भारतवर्षात जन्माला आलेल्या महानुभावांबद्दल त्यांना अत्यंत आदरदेखील होता. आपल्या व्याख्यान-प्रवचनांमधून तसेच संभाषणांमधून वेळोवेळी या श्रेष्ठ व्यक्तींचा ते नेहमीच उल्लेख करीत असत. महाराष्ट्राच्या उत्थानाला कारणीभूत झालेले आणि महाराष्ट्रात हिंदुधर्म, आध्यात्मिकता व अस्मिता पुनरुज्जीवित करणारे छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचे गुरू समर्थ रामदास स्वामी आणि संत श्रीतुकाराम महाराज इत्यादी कित्येक संत-महात्म्यांच्या चरित्रातील घटनांचा उल्लेख त्यांनी संभाषणाच्या ओघात केला आहे. स्वामीजींनी छत्रपती शिवाजी महाराजांसंबंधी आपले जे अत्यंत मौल्यवान व ओजस्वी विचार व्यक्त केले होते शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्त्व घडविण्यात त्यांच्या आईसाहेबांचे — जिजामातेचे योगदान अत्यंत मोलाचे आहे, हे सुद्धा स्वामीजींनी निदर्शनास आणले आहे. आपल्या आईची व आपल्या गुरूंची पालन करणे हे शिवाजी महाराज स्वत:चे कर्तव्य समजत असत. देव, प्रजा आणि धर्म यांची सेवा करणे हेच शिवाजी महाराजांचे ‘जगणे’ होते, गो-ब्राह्मण प्रतिपालन हेच त्यांचे ‘ब्रीद’ होते आणि धर्मप्रशासित राज्य स्थापन करणे हेच त्यांचे ‘ध्येय’ होते. शिवाजी महाराज अवतारी पुरुष होते अशी स्वामीजींची दृढ धारणा होती. लेखकाने लिहिले आहे की, ‘श्रीरामकृष्णांचे थोर शिष्य स्वामी विवेकानंद यांनी सनातन धर्माची मौलिक थोरवी आणि वैभव सार्या जगात पुन्हा प्रस्थापित केले, या दृष्टीने श्रीसमर्थ (रामदास स्वामी) व शिवाजी महाराज यांच्याशी त्यांचे निश्चितच साम्य आहे.’ (पृ.31)