‘मस्त कलंदर’ ही कथा आहे दोन प्रेमी जीवांची. या कथेतील ‘ती’ गरीब बिचारी. आधी हॉटेलात भाकर्या बडवणारी. मग तंबाखूच्या मळ्यात राबणारी. तिला भेटतो ‘तो’. तिच्याशी लग्न करू इच्छितो; पण तिच्या घरून होतो विरोध... ‘बळी’ कथेत म्हसोबाच्या नवसासाठी दिले जात कोंबड्यांचे बळी; पण एके दिवशी तिथे अचानक दिला गेला नरबळी एका वकिलाचा...‘गलत है लूट लिया’ कथेत, कविता आणि गाणी लिहिणारा तो भेटला लेखकाला; त्याला पुस्तक काढण्यासाठी पैसेही दिले लेखकाने; पण तो अचानक गायब झाला आणि त्याचं गाणं लेखकाला ऐकायला मिळालं पाकिस्तानच्या रेडिओ केंद्रावरून...‘फडा’ कथेतील श्यारीवर दिवाणजीची कामुक नजर खिळते आणि त्याच्या वासनेचा फडा तिला असहाय्य करतो...म्हाईची धामधूम, चुलीवर चढलेले हंडे, गावात आलेले पाहुणे, जेवणावळी, तमाशाची तयारी असं म्हाईचं साग्रसंगीत वर्णन येतं ‘म्हाई’ या कथेत...ग्रामीण जीवन...तिथल्या समजुती...तेथील दारिद्र्य...तेथील स्त्रीची अगतिकता...तेथील लोकांची सुख-दु:खं यांचं महादेव मोरे यांच्या लेखणीतून उतरलेलं सजीव चित्रण.
MAHADEV MORE WAS BORN IN NIPANI, BELGAUM. HE DID HIS EDUCATION UP TO SSC THERE. LATER, HE ENTERED KOLHAPUR TO STUDY INTER ARTS, BUT DUE TO THE HALAKHI CONDITIONS AT HOME, HE HAD TO LEAVE COLLEGE IN 1959. AFTER THAT HE ALSO DID MANY MANUAL LABOR JOBS TO RUN THE HOUSE.
महादेव मोरे यांचा जन्म बेळगाव येथील निपाणी येथे झाला. त्यांचे एस.एस.सी.पर्यंतचे शिक्षण तेथेच झाले. पुढे इंटर आर्ट्सचे शिक्षण घेण्यासाठी ते कोल्हापूरला दाखल झाले, मात्र घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे त्यांना १९५९ साली कॉलेज शिक्षण अर्धवट सोडावे लागले. त्यानंतर त्यांनी घर चालवण्यासाठी अनेक अंगमेहनतीची कामेही केली. मात्र एकीकडे त्यांचे लिखाणही चालूच होते. यादरम्यान त्यांनी कथा, कादंबरी, ललित लेख, प्रासंगिक लेख, दैनिकांच्या पुरवण्यांमधून सदर लेखन, समीक्षा लेखन असे विविधस्वरूपाचे लेखन केले. त्यांची पहिली कथा २२ ऑक्टोबर, १९५९ साली साप्ताहिक स्वराज्यमध्ये प्रकाशित झाली. नवयुग, किर्लोस्कर, गावकरी यांच्यावतीने घेण्यात आलेल्या विविध कथास्पर्धांमध्येही त्यांच्या कथांना पारितोषिके मिळाली. आजवर त्यांचे १४ कथासंग्रह, १८ कादंबऱ्या आणि ललित गद्य असे साहित्य प्रकाशित झाले आहे. चिताक या त्यांच्या कथासंग्रहास १९७५-७६ सालचा व चेहऱ्यामागचे चेहरे या संग्रहास राज्य पुरस्कार मिळाला. तसेच २००७ साली महाराष्ट्र फाऊंडेशन, अमेरिका यांचा जीवनगौरव पुरस्कार प्राप्त झाला आहे. झोंबड या त्यांच्या कादंबरीस १९९० सालातील सर्वोत्कृष्ट ग्रामीण कादंबरी म्हणून दोन पारितोषिकेही मिळाली. त्यांची थ्रील्स, बेंडल, तिंगाड आदी पुस्तकेही प्रकाशित झालेली आहेत.