स्वामी विवेकानंद हे साधारणत: आदर्श संत, आदर्श देशभक्त आणि मानवजातीचे आदर्श सेवक म्हणून लोकांना ठाऊक आहेत. ते उच्च कोटीचे आणि दैवी प्रतिभेचे कविदेखील होते ही गोष्ट सर्वसामान्य जनतेला माहीत नाही. कधी कधी आपल्याला दिसून येते की संतांची आध्यात्मिक शक्ती काव्याच्या किंवा कलेच्या रूपात प्रकट होते. आद्य शंकराचार्य, ज्ञानेश्वर, कबीर, तुलसीदास, मीराबाई इत्यादी संतांचे भव्योदात्त आध्यात्मिक अनुभव काव्यांतून वा गीतांतून प्रकट झालेले दिसतात. स्वामी विवेकानंदांनी सुद्धा अनेक कविता, गीते व स्तोत्रे रचली आहेत, आणि त्यांतून आपल्याला त्यांच्या उच्च आध्यात्मिक अनुभवांचे व अलौकिक प्रतिभेचे दर्शन घडते. स्वामी विवेकानंदांनी ‘प्रलय अथवा गाढ समाधी’, ‘सृष्टी’, ‘कालि करो मग नृत्य तिथे!’ इत्यादींसारख्या कविता दिव्य स्फूर्तीच्या अवस्थेत लिहिल्या आहेत आणि या कवितांवरून त्यांच्या आध्यात्मिक अनुभूतींची सखोलता व प्रगाढता आपल्या प्रत्ययास येते. त्यांच्या काव्याला परतत्त्वाचा, आत्मानुभूतीचा स्पर्श झालेला असल्यामुळे ते वाचताना सुद्धा त्या सर्वोच्च अनुभवाची, पुसट का होईना पण प्रतीती येते. त्यांच्या काव्यात मानवतेबरोबर दिव्यत्वाचाही साक्षात्कार घडत असल्यामुळे ते वाचकांच्या हृदयाची पकड घेते. वाचकांच्या सोयीसाठी आम्ही त्यांच्या काव्याचे चार विभाग केले आहेत. स्वामी विवेकानंदांनी इंग्रजी, बंगाली, संस्कृत व हिंदी या भाषांमधे काव्यरचना केली आहे. म्हणून प्रस्तुत पुस्तकाचे चार विभाग केले असून त्यात या चार भाषांतील कवितांचा, गीतांचा व स्तोत्रांचा अनुवाद समाविष्ट केला आहे.