पाश्चात्त्य देशांत वेदान्त आणि हिंदुधर्म यांच्या महिम्याचा उद्घोष करून 1897 साली मायभूमीत परतल्यानंतर स्वामी विवेकानंदांनी कोलंबोपासून अल्मोर्यापर्यंत ठिकठिकाणी जी व्याख्याने दिली ती अत्यंत ओजस्वी व स्फूर्तिदायक असून त्यांचा संग्रह ‘भारतीय व्याख्याने’ या नावाने आमच्या मठाने प्रसिद्ध केला आहेच. परंतु त्यातील जी व्याख्याने प्रामुख्याने आपल्या तरुणांना उद्देशून दिली आहेत व जी तरुणांच्या दृष्टीने विशेष उपयोगी आहेत त्यांचा एक वेगळा संग्रह असणे अत्यंत आवश्यक होते. असा संग्रह ‘To the Youth of India’ या नावाने अद्वैत आश्रम, कलकत्ता यांनी पूर्वीच प्रसिद्ध केला होता. त्याच पुस्तकाला अनुसरून ‘राष्ट्रीय युवावर्षा’च्या निमित्ताने प्रस्तुत मराठी पुस्तक प्रसिद्ध करण्यात येत आहे. आज सुमारे नऊ दशके उलटत आली तरी स्वामीजींची ही व्याख्याने वाचत असताना हृदयात अजूनही नवीन बलसंचार होतो व स्वामीजींच्या खोल अंतर्दृष्टीचा प्रत्यय येऊन मस्तक आदराने विनम्र होते. त्यातून देशाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी, राष्ट्राच्या पुनरुत्थानासाठी स्वामीजींनी सुचविलेले उपाय अचूक, अमोघ आणि अत्यंत व्यवहार्य आहेत. आज आपल्या देशाचे भविष्य युवाशक्तीवर अवलंबून आहे. म्हणून आपल्या युवकांनी स्वामीजींचे या व्याख्यानातील मर्म आत्मसात केल्यास आपल्या देशाचे यथार्थ हित साधेल हे नि:संशय. सुदैवाने आज स्वामीजींनी दाखविलेला आदर्श जीवनात उतरविण्यासाठी अनेक तरुण प्रयत्नशील असल्याचे आढळून येत आहे. अशा ध्येयनिष्ठ तरुणांना आपल्या ध्येयमंदिराकडे वेगाने अग्रेसर होण्यासाठी प्रस्तुत पुस्तक खचितच प्रेरणा, स्फूर्ती आणि शक्ती पुरवील असा आमचा विश्वास आहे.