रामकृष्ण मठ व रामकृष्ण मिशनचे तेरावे महाध्यक्ष श्रीमत् स्वामी रंगनाथानंद महाराजांनी ‘Role and Responsibility of Teachers in Building up Modern India’ या विषयावर, दिल्ली, फरिदाबाद व नोएडा येथील अपीजय विद्यालयांच्या शिक्षकांसाठी जे व्याख्यान दिले होते त्याच्या आधारावर भारतीय विद्याभवन, मुंबई द्वारे प्रकाशित इंग्रजी पुस्तकाचे हे मराठी भाषांतर आहे. स्वामी रंगनाथानंद जगप्रसिद्ध विद्वान-वत्ते होते. त्यांची प्रेरणादायी वाणी आधुनिक भारताच्या उभारणीत शिक्षकांची भूमिका आणि जबाबदारी प्रकट करून दाखविते. जे शिक्षक केवळ अर्थोपार्जनासाठीच विद्यार्थ्यांना शिकवितात, आणि जे शिक्षक भावी सुविद्य नागरिकांना तयार करण्याच्या भावनेने विद्यार्थ्यांना शिकवतात, त्यांच्यात काय अंतर आहे हे स्वामी रंगनाथानंदांनी अगदी स्पष्टपणे निदर्शनास आणले आहे. जे शिक्षक सुबुद्ध मनाने शिकविताना आपल्या कर्तव्य व जबाबदारीची जाणीव बाळगतात ते आपल्या स्वत:च्या जीवनात आणि विद्यार्थ्यांच्या जीवनात गहन, उदात्त मूल्ये पेरून भारताचे भविष्य उज्ज्वल करण्यात साहाय्यक होतात. स्वामी विवेकानंदांनी यालाच मनुष्य निर्माण करणारे, चारित्र्य निर्माण करणारे शिक्षण म्हटले आहे. अशा शिक्षणामुळे चारित्र्य निर्माण करण्यासाठी काय अंगिकारावे व काय टाळावे याचा विवेक विद्यार्थ्यांमध्ये उदय पावतो. आपण राहात असलेल्या प्रदेशातील पर्यावरणाची जाणीव, राष्ट्रनिष्ठा, राष्ट्रप्रेम व राष्ट्रीय जबाबदारी जोपासल्याने व्यक्ती ही विकसित व्यक्ती होते. आणि भारताचे विकसित नागरिक तयार होऊन आपल्या देशात सध्या ज्या समस्या आणि आव्हाने आपल्याला भेडसावत आहेत त्यांचा सामना करण्यास ते सक्षम होतील व आपल्या देशाचा विकास करण्यास साहाय्य करतील.