हेच जीवन आपल्याला सुखाने जगावयाचे आहे. ह्या जीवनाचे ‘तत्व’ ज्यांनी ‘पाहिले’ आहे ते तत्त्वदर्शी ज्ञानेश्वर म्हणतात – “तुमच्या जीवनाचे म्हणा की ह्या जगताचे म्हणा, भोग्य आणि भोक्ता असे हे जे मूलभूत घटक आहेत, ते आहेत तसेच तुमच्या प्रत्ययाला येत आहे तसेच खरे आहेत असे तुम्ही धरून चालता, आणि त्यांतील ज्यापासून सुख होते किंवा होण्याची आशा असते त्यांना तुम्ही जळूप्रमाणे चिकटून बसता नि ज्यापासून दुःख होते किंवा होण्याची शक्यता असते त्यांच्या तुम्ही वाऱ्यालाही उभे राहू इच्छीत नाही. भोग्य-भोक्त्यांविषयीचा हा सत्यत्वबोध आणि त्या बोधातून उफाळणारी तुमची सुखेच्छा यांचा परिणाम काय होतो? – ‘या विषयांवाचूनि काही। आणिक सर्वथा रम्य नाही। ऐसा स्वभावोचि पाही। इंद्रियांचा॥ देखे इंद्रियी कामु असे। तो लावी सुखदुराशे। जैसा गळी मीनु आमिषे। भुलविजे गा॥ परी तयामाजी गळु आहे। जो प्राणाते घेऊनि जाये। तो जैसा ठाऊक नोहे। झाकलेपणे॥’ परिणाम – दुःख, अतृप्ती! या अनिवार्य, अपरिहार्य आशाभंगाचे कारण हेच की तुमच्या नित्य प्रत्ययाला येणारे हे ‘भोक्ता-भोग्य’ द्वय आहे तसेच खरे नाही!”