स्वामी विवेकानंद सत्यद्रष्टे ऋषी होते. ते युगावतार भगवान श्रीरामकृष्ण यांचे अंतरंगीचे लीलासहचर होते; त्यांच्या युगधर्मसंस्थापन-कार्यातील प्रमुख सहायक होते. त्यांनी सनातन वैदिक धर्माला पुनरुज्जीवित केले व सर्वत्र त्याचा प्रसार करून संपूर्ण विश्व चैतन्याने ओतप्रोत करून सोडले. आध्यात्मिक प्रकाशाने परिपूर्ण असे स्वामीजींचे लोकोत्तर जीवन अतिशय स्फूर्तिदायक आहे. त्यांच्या ओजस्वी विचारांत आमच्या देशवासियांच्या हृदयात संजीवनशक्तीचा संचार करण्याचे सामर्थ्य विद्यमान आहे. आज आपल्या राष्ट्रीय जीवनातील असा कोणताच प्रश्न नाही की ज्याचे उत्तर आम्हाला त्यांच्या शिकवणुकीत सापडणार नाही. स्वामीजींचे प्रेरणादायी जीवन आणि विचार यांचा जितका जास्त प्रचार-प्रसार होईल तितकेच आपल्या राष्ट्राचे कल्याण होईल.