"स्त्रिया
एकमेकींपेक्षा वेगळ्या का बरं नसतात....?'' अश्वत्थाखाली बसलेल्या
कृष्णाच्या मनात द्रौपदीच्या महालात घडलेली घटना डोळ्यांसमोर येऊन, अनेक
विचार येत होते.... "कोणत्याही युगात, कोणत्याही वयाची स्त्री का बरं
एकसारखाच विचार करते? एकसारखाच अनुभव घेते? समान बाबतीत वेदना अनुभवते? का
बरं एकसारख्या गोष्टींबद्दल रागावते? राग यक्त करण्याची रीत पण का बरं
एकसारखीच असते....?'' कृष्णाच्या मनात प्रश्न आले आणि त्यावर तो स्वत:च
हसलाही. या प्रश्नांना आता काही अर्थ होता का? आयुष्य जगून झालं होतं...
"आपल्या जीवनात आलेल्या महत्त्वाच्या तीनही स्त्रिया आपल्याबद्दल का बरं
एकसारख्याच संवेदना अनुभवत होत्या? का बरं एकाच पद्धतीनं दु:खी होत होत्या?
आणि का एकसारख्याच तीव्रतेनं आपल्यावर प्रेम करत होत्या?...'' खरं तर असा
विचार करण्याची वेळही आता निघून गेली होती. आता होतं ते... केवळ स्मरण...!
प्रत्यक्ष दृष्टीसमोर त्या स्त्रिया नव्हत्याच. तरीही त्या तिघींचे डोळे
त्याच्याकडे बघत होते... आशेनं, अपेक्षेनं, उपहासानं आणि ... निखळ
प्रेमानंही! तीन नद्यांचा प्रवाह मिळून त्याच्या दृष्टीसमोरून सागराकडे जात
होता. लाटांवर खाली-वर नाचणारे प्रकाश-किरण जणू अस्पष्ट रेषांद्वारा त्या
तिनही स्त्रियांचे चेहरे चितारीत होते.... प्रेयसी... पत्नी... आणि सखी...
त्या तिघी जणी... खळाळणार्या प्रवाहाबरोबर वाहात जणू म्हणत होत्या...
"तुझ्यात विलीन होण्यातच आमच्या जीवनाचं सार्थक आहे. तुझा खारटपणा
स्वीकार्य आहे. कारण तूच आम्हाला विशालता दिलीस, अमर्याद पसरण्याचा तो
अस्तित्वबोधही तूच दिलास... आमचं प्रखर तेज सामावून घेऊन आम्हाला शीतलता
दिलीस तू... आमचं स्त्रीत्व स्वीकारून अखंड प्रेम दिलंस तू....''