स्वामी वरदानंद भारती , पूर्वाश्रमीचे प्राचार्य अनंत दामोदर आठवले , यांचा जन्म अनंतचतुर्दशीच्या दिवशी (दि.२७/०९/१९२०) पुणे येथे झाला. कुशाग्र बुद्धिमत्तेचे धनी असलेल्या अनंतरावांचे शालान्त शिक्षण पंढरपुरात झाल्यानंतर पुण्याच्या टिळक आयुर्वेदिक महाविद्यालयातून आयुर्वेद विद्या 'पदवी व विशारद' या दोन्ही पदव्या त्यांनी प्राप्त केल्या. पुढे याच महाविद्यालयात व्याख्यता, उपप्राचार्य व प्राचार्य पदांवर काम लेले. आयुर्वेदाचे शिक्षण घेत असताना अभ्यासक्रमानुसार क्रमिक पुस्तके उपलब्ध नाहीत, ही त्रुटी त्यांच्या लक्षात आली. स्वतःच्या बुद्धीकौशल्याच्या जोरावर व सहकाऱ्यांच्या सहाय्याने त्यांनी ०५ महत्वाची क्रमिक पुस्तके सिद्ध केली. ही पुस्तके आजहि आयुर्वेदाच्या अभ्यासक्रमात उपयोगात आणली जतात.
अनंतरावांचा प्रतिपाळ संतकवी दासगणू महाराज यांच्या कृपाछत्राखाली झाला. घरातील धार्मिक वातावरणामुळे व महाराजांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या अध्यात्मिक बुद्धीचा परिपोष वृद्धीगंत होत होता. याचा परिपाक म्हणून वयाच्या ३० व्या वर्षी भगवान् श्रीकृष्णांच्या चरित्रावरील पादाकुलक वृत्तातील अठरा सर्गाचे "श्रीकृष्णकथामृत" हे अप्रतिम व रसाळ महाकाव्य त्यांनी रचले.
आधुनिक साहित्यिकांनी लेखनाद्वारे महाभारत रामायणातील व्यक्तिरेखांचे केलेले अवमूल्यन त्यांना सहन झाले नाही. त्या सर्वांचे खंडन करणारी मूळ महाभारताचा आधार घेऊन त्यावर अभ्यासपूर्ण व व्यासंगी व्याख्याने दिली. त्यातूनच पुढे ह्या संदर्भातला ‘महाभारताचे वास्तव दर्शन’ या महत्त्वाचा ग्रंथाची निर्मिती झाली. आपल्या धर्माविषयी, संस्कृतीविषयी, आपल्या परंपरांविषयी अनेकांच्या अनेक प्रश्न-समस्या असतात / आहेत. त्या सर्वांना शास्त्रोक्त, साधार व यथोचित उत्तरे देणारा ‘वाटा आपल्या हिताच्या’ हा ग्रंथ वाचकवर्गात लोकप्रिय झाला.
आपल्या परंपरेत उपनिषदे, भ.गीता व ब्रह्मसूत्रे यांवर भाष्य लिहिणाऱ्या व्यक्तीला 'आचार्य' ही पदवी दिली जाते. अनंतरावांनी सुद्धा या प्रस्थानत्रयींवर भाष्य लिहून आपला आचार्यपदावर अधिकार सिद्ध केला आहे. भ.गीतेच्या प्रत्येक अध्यायावर केलेले भाष्य सर्वसामान्यांना गीतेतील तत्वे अगदी सहजपणे समजावून देते. मराठी भाषेचे लेणं म्हणजे माऊलींची ज्ञानेश्वरी! तथापि भाषेच्या जुनेपणामुळे ती सामान्य लोकांना समजेनाशी झाली. ही अडचण दूर करण्यासाठी त्यांनी प्रचलित मराठी भाषेत समश्लोकी म्हणावा असा ओवीबद्ध "अनुवाद ज्ञानेश्वरी" हा बहुमोल ग्रंथ निर्माण केला.
पुढे नंतर अनेकानेक सद्ग्रंथांची निर्मिती त्यांच्या हातून झाली. साधक वर्गात लोकप्रिय झालेला, त्यांच्या सखोल चिंतनातून सिद्ध झालेला अजून एक मनोज्ञ ग्रंथ म्हणजे समर्थ रामदास स्वामींच्या 'मनाचे श्लोक' यांवर भाष्य करणारा 'मनोबोध'. हा ग्रंथ म्हणजे प्रत्येक चिंतनशील व्यक्तीसाठी सन्मार्ग दीपकच ठरावा. असे एकंदरीत ६५-७० उत्तमोत्तम अध्यात्मिक ग्रंथ त्यांनी निर्माण केले. तसेच अनेकानेक देवतांची रसाळ स्तोत्रे, आरत्याहि रचल्या. ही स्तोत्रे वाचताना आद्य शंकराचार्यांची आठवण झाल्या शिवाय रहात नाही.
‘मनुस्मृती: सार्थ-सभाष्य’ हा ग्रंथ त्यांनी त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात पूर्णत्वास नेला. १००० पृष्ठांचा हा बृहत ग्रंथ त्यांच्या कठोर अभ्यास व प्रदीर्घ चिंतन यातून सिद्ध झाला असून आजच्या सर्व अनुकूल-प्रतिकूल प्रश्नांची समर्पक उत्तरे देणारा आहे. याची धाटणी खंडण-मंडण या स्वरूपाची आहे.
त्यांचे सर्वच वाङ्मय ईश्वरभक्ती, स्वसंस्कृतीचा सार्थ अभिमान आणि राष्ट्रप्रेम यांनी ओतप्रोत भरलेले आहे. आयुष्यभर त्यांनी सन्नीती, सद्विचार व सदाचार याचाच प्रचार व प्रसार केला. यासाठी कीर्तने-व्याख्याने हे माध्यमहि अत्यंत प्रभावीपणे उपयोगात आणले. त्यांचे हे कार्यक्रम हजारोंच्या संख्येने मोजावे लागतील.
श्रावण व.११ शके १९२४ या दिवशी त्यांनी गंगास्नानोत्तर संजीवन समाधी घेतली व ते त्यांच्या आराध्य देवता श्रीवरद नारायणाच्या चरणाशी विलीन झाले. आजच्या विज्ञानयुगातहि संजीवन समाधी साधता येते, हे त्यांनी कृतीने दाखविले. ‘कश्चिन्माम् वेत्ति तत्त्वत:’ या कोटीतले ते दिव्य पुरुष होते. त्यांच्या दिव्य जीवनाला अनंत कोटी प्रणाम !